आळंदीत जाणीव संघटनेच्या नामफलकाचे उद्घाटन; फेरीवाल्यांवरील कारवाईविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
आळंदी : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महिला व पुरुष पथ विक्रेते, फेरीवाले, हातगाडीधारक, स्टॉलधारक तसेच फिरते विक्रेते यांच्या आत्मसन्मानासाठी आणि आत्मनिर्भर जीवनशैलीसाठी कार्यरत असलेल्या जाणीव संघटनेच्या आळंदी शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन क्रांती पार्क मार्गावर उत्साहात करण्यात आले. या वेळी फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, आळंदी नगरपरिषदेने फेरीवाला समिती पूर्णपणे गठीत केल्याशिवाय पथ विक्रेते, फेरीवाले, स्टॉलधारक व हातगाडीधारक यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी करण्यात आली.
जाणीव संघटनेचे मार्गदर्शक तथा कार्यवाह संजय शंके यांनी यावेळी नगरपरिषद प्रशासनाला खणखणीत इशारा दिला. आळंदी पंचक्रोशीत पथ विक्रेते, फेरीवाले व हातगाडीधारक यांच्यावर अन्यायकारक कारवाई झाल्यास नगरपरिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला व पुरुष पथ विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायातून उदरनिर्वाह करण्याचा अधिकार मिळावा, त्यांचा आत्मसन्मान जपला जावा आणि त्यांना आत्मनिर्भरपणे जीवन जगता यावे, या उद्देशाने आळंदीत संघटनेची शाखा सुरू करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत या उपक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमात जाणीव संघटनेचे मार्गदर्शक तथा कार्यवाह संजय शंके, महिला अध्यक्ष श्वेता ओतारी यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जाणीव संघटना पिंपरी-चिंचवड तसेच आळंदी परिसरातील पदाधिकारी, फेरीवाले, हातगाडीधारक व भाजी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.जाणीव संघटनेच्या कष्टकरी विभागाचे सुलतान शेख, रमेश शेलार, नितीन नाहाटे, अर्जुन मेदनकर, हमीद शेख, दत्तात्रय शिंदे, प्रल्हाद अहिर, निळकंठ महाराज नायबळ, गोविंद ठाकूर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आळंदी शहर शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, भाजप व्यापारी आघाडी प्रमुख अविनाश बोरुंदिया, भारतीय बौद्ध महासंघ आळंदी अध्यक्ष संदीप रंधवे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी मनोगत व्यक्त करून जाणीव संघटनेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी महिला पथ विक्रेत्यांना संघटनेच्या लोगोचा ड्रेस कोड असलेल्या एप्रॉनचे वाटप करण्यात आले. महिला पथ विक्रेत्यांना संघटित करून त्यांच्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, कार्यक्रमात फेरीवाला धोरण योजना पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. जाणीव संघटनेच्या वतीने फेरीवाला धोरण योजना २०२६-२७ संदर्भातील कार्यवाहीसाठी संबंधित कागदपत्रे आळंदी नगरपरिषद प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आळंदी शहर अध्यक्ष सुलतान शेख आणि अर्जुन मेदनकर यांनी जाणीव संघटनेची भूमिका स्पष्ट केली. फेरीवाले आणि पथ विक्रेते हे शहराच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून, त्यांच्या उदरनिर्वाहावर गदा आणण्याऐवजी त्यांचे योग्य नियोजन करून त्यांना व्यवसायासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रुखसना भाभी, सरला ताई, सुरेखा ताई, सुमन ताई, संगीता ताईमेटे, शीतल शेलार, कांता मावशी यांच्यासह महिला पथारी व्यवसायिकांनी विशेष योगदान दिले. क्रांती पार्क मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा माजी सैनिक अब्बास भाई शेख यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन नाहाटे यांनी केले. स्वागत अर्जुन मेदनकर यांनी केले, तर सूत्रसंचालन सुलतान शेख यांनी केले.फेरीवाला समिती पूर्ण गठीत करूनच पथ विक्रेत्यांच्या प्रश्नांवर निर्णय घ्यावा. समिती गठीत होण्यापूर्वी अन्यायकारक कारवाई केल्यास जाणीव संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा स्पष्ट इशारा संजय शंके यांनी यावेळी दिला.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





