वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी कृती समितीची बैठक
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद : पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील वाघोली, केसनंद व लोणीकंद परिसरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे–नगर रोड वाघोली–केसनंद वाहतूक कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या पुढाकाराने वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी बकोरी येथे बैठक घेण्यात आली.
बैठकीस वाघोली वाहतूक विभागाचे सहायक पोलीस अधिकारी किशोर तणपुरे, माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गोविंद वारघडे, सामाजिक कार्यकर्ते संपत गाडे, सुरेश सातव, सरपंच विशाल हरगुडे, माजी सरपंच दत्तात्रय हरगुडे यांच्यासह नागरिक व समितीचे सदस्य उपस्थित होते.
पुणे शहराचे उपनगर म्हणून झपाट्याने विकसित होत असलेल्या वाघोली, केसनंद व लोणीकंद परिसरातून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक व प्रवासी पुणे शहराकडे ये-जा करतात. मात्र, वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना तासनतास रस्त्यावर अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे वेळ, इंधन व आर्थिक नुकसान होत असून रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावर अनधिकृतपणे प्रवासी वाहने थांबविणे, खाजगी बस व स्कूल बसमुळे होणारे अडथळे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, रस्त्यावरील खड्डे तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे विद्युत पोल यामुळे कोंडीत आणखी भर पडत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.
वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर स्थानिक नागरिकांना एकत्रित करून व्यापक लढा उभारण्यासाठी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गोविंद वारघडे यांच्या पुढाकाराने वाहतूक कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला असून नागरिकांनी वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची माहिती, फोटो व व्हिडिओ या ग्रुपवर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती संबंधित वाहतूक विभागापर्यंत पोहोचवून तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संपत गाडेसह आदी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
बैठकीत रस्त्यांचे रुंदीकरण, पर्यायी मार्ग तातडीने सुरू करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, वाहतुकीला अडथळा ठरणारे विद्युत पोल हलविणे आणि रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आदी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. वाहतूक कोंडीवर केवळ तात्पुरती व्यवस्था न करता कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी ठाम भूमिका समितीच्या बैठकीत घेण्यात आली.
दरम्यान, यापूर्वी निवेदने देऊनही ठोस कार्यवाही झाली नाही, तर नागरिकांच्या सहकार्याने लोकशाही मार्गाने उपोषण व आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीच्या सदस्यांनी दिला.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





