धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या तुळापूर–वढू बुद्रुक विकास आराखड्याला मुख्यमंत्री फडणवीस यांचा हिरवा झेंडा
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
नवीन रस्ता व भीमा नदीवरील पुलामुळे अंतर होणार घट
लोणीकंद टाईम्स प्रतिनिधी
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र बलिदान स्थळ तुळापूर (ता. हवेली) ते समाधी स्थळ मौजे वढू बुद्रुक (ता. शिरूर) या दरम्यान नवीन रस्ता आणि भीमा नदीवरील पुलाच्या निर्मितीसाठी प्रस्तावित ५३२.५१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकास आराखडा शिखर समिती बैठकीत मंजुरी मिळाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार ज्ञानेश्वर कटके यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सध्या तुळापूर ते वढू बु. या मार्गावर सुमारे १४ किमी अंतर असून ३० ते ४० मिनिटांचा प्रवास करावा लागतो. भीमा नदीवरील नवीन पुलामुळे रस्ता केवळ साडेसहा किलोमीटरपर्यंत कमी होणार असून यात्रेकरू आणि पर्यटकांचा मोठा वेळ वाचणार आहे. पुलावर ‘व्हिव्हिंग गॅलरी’ची तरतूद असून पुलाची रचना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून देणारी असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

तुळापूर व वढू बुद्रुक येथे वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक भेट देतात. त्यामुळे विकास आराखडा राबविताना ग्रामस्थांच्या सूचनांचा आदर करावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पूल, घाट, प्रकाशयोजना, सौंदर्यीकरण ही सर्व कामे इतिहासाची आठवण जिवंत ठेवतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुलाची रुंदी वाहतुकीस पुरेशी असावी व रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा येथे येण्याची इच्छा निर्माण होईल, असे विकासकाम व्हावे, असे ते म्हणाले.
तुळापूर बलिदान स्थळ येथील विकास आराखडा: संग्रहालय, ८२ आसनी 10D शो सभागृह, प्रशासकीय इमारत, ग्रंथालय, स्मरणिका दुकाने, ३५० मीटर नदी घाट, वाहनतळ, शौचालये व उपहारगृह, १२ मीटर रुंदीची व्हिव्हिंग गॅलरी असलेला पूल, १०० फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज
वढू बुद्रुक समाधी स्थळ येथील विकास आराखडा:संग्रहालय, प्रशासकीय इमारत, स्मरणिका दुकाने, १२० मीटर नदी घाट, वाहनतळ, शौचालये व उपहारगृह, १०० फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज, छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला अधिक भव्य आणि स्मरणीय स्वरूप देण्याच्या दिशेने हा विकास आराखडा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. तुळापूर–वढू बुद्रुक दरम्यानचा नवीन रस्ता आणि पूल पर्यटकांना सहज व सुरक्षित प्रवास देणार आहेत.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





