नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परतलेल्या भाविकांचे जल्लोषात स्वागत
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद, प्रतिनिधी :
हवेली तालुक्यातील लोणीकंद येथील भारती वाळुंज, शांता जमादार, यशवंत कंद आणि दशरथ फराटे यांनी पवित्र नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करून गावात परतल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे उत्साहपूर्ण व भावपूर्ण स्वागत केले. तब्बल १०३ दिवसांची कठीण व आध्यात्मिक नर्मदा परिक्रमा पूर्ण करून ते सुखरूप परतल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
नर्मदा नदीची परिक्रमा ही हिंदू धर्मातील अत्यंत कठीण आणि पवित्र धार्मिक साधना मानली जाते. संपूर्ण परिक्रमा पायी करताना साधकांना विविध नैसर्गिक परिस्थिती, शारीरिक कष्ट तसेच कठोर धार्मिक नियमांचे पालन करावे लागते. श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर भारती वाळुंज व सहकारी भाविकांनी ही परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली. परिक्रमा पूर्ण करून लोणीकंद येथे आगमन होताच ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करत, हार घालून आणि पारंपरिक पद्धतीने त्यांचे लोणीकंद येथील ग्रामदैवत मसोबा मंदिरात जल्लोषात स्वागत केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य मोनिका कंद, सामाजिक कार्यकर्ते उत्तम भोंडवे, हभप गुलाब कंद, बाळासाहेब मोरे, निवृत्ती कंद, जनार्दन वाळुंज, चंद्रकांत वाळुंज, अंजली वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी भाविकांचा सत्कार करून त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचे कौतुक केले.
या स्वागत समारंभाला गावातील महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी अशा धार्मिक व प्रेरणादायी उपक्रमात सहभागी होणे ही समाजासाठी अभिमानाची बाब असून यामुळे इतर महिलांनाही प्रेरणा मिळते, असे सामाजिक कार्यकर्ते उत्तम भोंडवे यांनी यावेळी सांगितले.
ग्रामस्थांनी नर्मदा परिक्रमा साठी गेलेल्या सर्वांचे चिकाटीचे व श्रद्धेचे कौतुक करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. परिक्रमेतील अनुभव त्यांनी उपस्थितां समोर मांडताना हा प्रवास आयुष्याला नवी दिशा देणारा आणि आत्मिक समाधान देणारा असल्याचे नमूद केले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे लोणीकंद गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





