वटपौर्णिमेनिमित्त बकोरी देवराईत पर्यावरणपूरक उपक्रम; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
बकोरी, ता. हवेली : वटपौर्णिमेच्या निमित्ताने बकोरी येथील देवराई वनराई प्रकल्पात वडाच्या झाडाचे पूजन व वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. खडकाळ व ओसाड माळरानावर गेल्या दहा वर्षांत एक लाखांहून अधिक झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन तसेच पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचे उल्लेखनीय कार्य करणारे वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांच्या कार्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी बोलताना डॉ. माने यांनी वृक्षसंवर्धन आणि जलसंधारण ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. खडकाळ व ओसाड माळरानावर झाडे लावून ती वर्षानुवर्षे जगविणे हे अत्यंत आव्हानात्मक कार्य असून वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांनी हे अशक्य वाटणारे काम प्रत्यक्षात करून दाखविल्याचे त्यांनी नमूद केले.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला गटविकास अधिकारी शेखर शेलार, तहसीलदार तृप्ती कोलते, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश रासकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक अभियंता अरुण पुजारी, वनपरिमंडल अधिकारी प्रमोद रासकर, मंडल अधिकारी संदीप झिंगाडे, वनरक्षक अंकुश कचरे, अनिल राठोड, ग्राम महसूल अधिकारी संजय गारकर, ग्रामविकास अधिकारी मनीषा इंगळे यांच्यासह अनेक महिला व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
देवराई वनराई प्रकल्पामध्ये जलाशयाची निर्मिती, सुमारे ७० टक्के औषधी वनस्पतींची लागवड तसेच चार हजार चौरस फुटांमध्ये चार हजार झाडांचा ‘अकीरा मियावाकी’ प्रकल्प साकारण्यात आला आहे. या वनराईत आज हजारो पक्ष्यांचे अधिवास निर्माण झाले असून त्यांच्यासाठी नियमित दाणा व पाण्याची व्यवस्था करण्यात येते.
वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे व त्यांचे कुटुंब गेल्या दहा वर्षांपासून या वनराईचे निस्वार्थपणे संगोपन करत आहे. लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन करण्याची संकल्पना राबवत एक कोटी झाडे लावण्याचे आणि लाखो लिटर वाहून जाणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती चंद्रकांत वारघडे यांनी यावेळी दिली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





